Friday, October 4, 2013

माझ्या छबुकल्या डड्डा

देशात धर्मांध जातीयवाद्यांचा विजय होत असतानाच
तू जन्माला आलास
भयग्रस्त भूतकाळ घेवून
तुझ्यासाठी मी जोपासून ठेवली नाही
रंगीबेरंगी स्वप्नांची बेगडी फुलबाग
आपला असाह्य इतिहासच
कट्याकुट्यातून वाट काढीत आलाय तुझ्यापर्यंत.


डड्डा
तू जन्मलास नि,
आनंदान हुरळून जाण्याएवजी
मी भितीनच गारठून गेलो सर्वार्थान.
फटके फोडून मी साजराही करू शकलो नाही
आनंदोत्सव तुझ्या जन्माचा .
सार शहरच कस हादरून गेलंय बघ
कत्तली, जाळपोळ, बॉम्बस्फोटांनी.
प्रत्येकाच्याच डोळ्यात
अविश्वासाची सळसळती नागीण
नि, दातखिळ बसविणारी दहशत
हातात विनाशाचे सुरे
अन डोळ्यात अविवेकी उद्रेक.
इथ माणूसच माणसाविरुद्ध उठलाय
नपुंसक एस्पितासाठी.
मशिदीतील बांग
नि,
मंदिरातील आरत्यांच्या कोलाहलात
कुणालाच कसा ऐकू येत नाही
तडफडनार्या भुकेचा आवाज ?
तुझे बोबडे बोल ऐकण्यासाठी
मी माझे कान नि काळीज
शाबूत तरी कसे ठेवू?


डड्डा,
हा माझ्या एकट्याचाच नाही
आमच्या समस्त पिढीचाच आक्रोश आहे
रक्तामासाचा चिखल तुडविताना
कुणाच्याच सद्सदविवेक बुद्धीला
फुटत नाही माणुसकीचा पान्हा
आम्ही अजूनही
रक्ताची जात अन धर्म शोधण्यातच मश्गुल आहोत.
आम्हाला आवडत
कुणाच्याही तालावर नाचण
परस्परामध्ये भिंती आखून घेण
दगडामातीच्या देवाधीकांसाठी
हाडामासांच्या माणसांचा कोथळा बाहेर काढण
आधुनिकतेकडून पुराणाकड चाललेला
आमचा हा अधोगतीचा दिशाशून्य प्रवास थोपवून
तू दाखवशील का आम्हाला प्रकाशाचे दार ?

शेवटी इतकंच;
माझी म्हातारपणातली काठी म्हणून
मी पहात नाही तुझ्याकड आशाळभूत
मला फक्त तुझ्यात
पेटवायची आहे संघर्षाची वात
माणसाला माणसात आणण्यासाठी

म्हणूनच -
तू भरभर मोठा हो !
खूप खूप मोठा हो !
माणूस हो !!

Thursday, October 3, 2013

क्षण सुखाचे

तुझ्यातील माणूसपण मी जोखले होते
क्षणही सुखाचे जरा, मी चाखले होते

चेहऱ्यात एका तुझ्या, चेहरे अनेक होते
लुटलो तरीही माझे, इरादे नेक होते

तुला सोसण्याचे, जडलेले छंद होते
मस्तीतले दुख:ही, भलतेच धुंद होते

असणे माझे तुझ्यापरी, नसल्यासवेच होते
भोवती तुझ्या सारे, गुलछबु थवेच होते

तू आखलेले वर्तुळ , तुझ्यापुरते जग होते
डोळे पुसणारे तुझे, काहीजण ठग होते

चुकते मी केले ते, हिशेब चोख होते
काळाचे उत्तरही, त्यावर रोख होते

नावात तुझ्या आयुष्य, सामावले होते
पूर्वजही तेव्हा माझे, दुखावले होते

पेटलेल्या माणसांच्या कोलाहालात



स्वत:चा चेहरा उतरवून ती
माझा चेहरा चाचपडत येते
वाट काढीत काढीत
पेटलेल्या माणसांच्या धुमसणार्या कोलाहालातून
थेट या शहराच्या दुखर्या वस्तीत.

.


तिच वैतागाची नि, माझ्या वेदनेची
घटकद्रव्ये एकच असल्याने
आता,
माझ्याप्रमाणेच तिलाही आलेला आहे
गर्दीचा चेहरा.

.


आम्ही दोघे
हे शहर अन् माझी वस्ती
या दरम्यानची रेषा पुसट करण्याच्या प्रयत्नात.

.


पेटलेल्या माणसांच्या धुमसणाऱ्या कोलाहालात
अजूनही,
तिच्या बांगड्यांची किणकीण एैकली की,
माझ्या डोळ्यांची पाखरं भिरभिरतात
पूर्वीसारखी...

.

फुलांच्या कविता

माझ्या दारावरून नुकतीच
फुलांची वरात निघून गेली
अन् तितक्यात तुझी आठवण आली.
अशावेळी
वाळवंटातही फुलांची रात्र फुलते.

.



नुकतीच कुठं
माझ्या अंगांगावर फुलं फुललीत.
एवढ्यात निरोप घेऊ नकोस !
‘कोमेजणे’ हा फुलांचा गुणधर्म असला तरीही.

.



फुलांच्या प्रदेशात
बेभान भटकणं मला आवडतं
अन्
प्रेतात्रा पाहणंही !

.



तू नेहमीच फुलांच्या गोष्टी करतेस
हे कळाल्यापासून आता
प्रत्येकानं आपापल्या घरासमोर
फुलांचं रोपटं लावलं.....

.

ती
















ती 
कुणी तरी एक चारचौैघींसारखी
मुलगी, बहिण, बायको, आई
या कर्तव्याच्या कचाट्यात जखडलेली.

.



कुणाही नराच्या कामांध नजरेनं
तिच शरीराचा इंच न् इंच भाग
विवस्त्र होत जातो
‘शील’ नावाचं काचेचं भांडं सांभाळता सांभाळता.

.




मूर्तिमंत त्यागाच प्रतीक बनलेली ती
समंजस दु:ख पदराखाली दडवून
वेदनेला पान्हा फुटला तरी
फक्त आतल्याआत खिळखिळी होत जाते.

.



म्हटलं तर,
ती निष्पाप बाळाचं आभाळभर खिदळणं
अन्
पेटून उठल्यावर
रौद्ररूपी राक्षसाचं खिंकाळणं.

.



ती आणून ठेवते
स्वर्गसुखाच मुक्तिद्वारार्पंत
किंवा,
खुलंही करते मरणसुन्न नरकाचं थोबाड.

.



या जालीम दुनिेयेत
ती आजही चारचौघींसारखीच
आभाळाला टिळा लावणच्या प्रयत्नात
माझ्या सोबतीच्या प्रतीक्षेत
मुक्तीलढ्याच्या तयारीत...

.

 

माणसांचं मूल्य

दिवसभर आपण
आभाळाच समान वाटपाबद्दल बोलतो
पण,
संपूर्ण आभाळ कुणी पाहिलं?
म्हणून
या खिडकीतून दिसणारा आभाळाचा चौकोन
आता माझा आहे.

.


बॉसच्या कामांध नजरा टाळून
प्रत्येक रात्री तिच्या स्वप्नात येतो
एक राजकुमार पांढर्याशुभ्र घोड्याच्या रथातून
अन् घेऊन जातो तिला
झोपडीतून आपल्या महालात.

तिने आता कूस बदललेली असावी!

.



कालच असंतोषी मोर्चाबाबत
आपण खूप काही बोललो
‘मोर्चाच्या निषेधाची दिशा आता बदलाला हवी’
असं मी म्हणालो तेंव्हा -
अंधार पेटवाला एक काडीही पुरेशी असते
असंच मला अभिप्रेत होतं.

.



निवडणुका जवळ आलत...

आपल्या देशातील जनता
आपलं राजकीय मत
शिक्के मारून प्रगट करते.

.



मंदिराच्या पाथशी
विखुरलेल्या झोपड्या
माणसाचं मूल्य ढासळात चाललंय ....

.




शहर कसं सुनसान...तणावग्रस्त
दंगल होऊन गेल्यानंतर
कर्फ्यु लावल्यागत्

सूर्योदयाची वाट पहात....

.

अमृताचे नितळ थेंब

मंतरलेली संधकाळ


तुझ्या प्रगल्भ आठवणींसह

.


मालवलेला दिवा
विझून गेलेली स्वप्नं
स्वप्नातलं विरस चांदणं

.

दोन देहांचा प्रकाश
सभोवार काळाकभिन्न अंधार
अन्
तुझ्या किणकिणत्या बांगड्यांच्या आवाजात
धपापणारा जीव 
.

दोन्ही शरिरांची घुसमट
घामाचा कस्तुरी सुवास
दिशा-दिशांमधून लवलवणार्या जिभा
तप्त शिसावर टपटपणारे
अमृताचे नितळ थेंब.
. .


दीर्घ सुस्कारा युगे ओलांडून जाणारा....
 .
.

माझ मत


‘हे जे चाललंय ते
असंच चालायचं
हे चालणार नाही’
असं मी म्हटलेलंही
त्यांना चाललं नाही.
त्यांनी मला देशद्रोही ठरवलं...
चालायचंच !


खरंच,
 खरं बोलणंही आता
‘खरं’ वाटत नाही.
सगळेच क्रांतीची भाषा बोलू लागलेत.
पण ती येईल
हेही तितकंच खरं.


एकमेकांशी संवाद साधणं
अवघड होऊन बसलंय
नाही असं नाही.
तरीही आपण
एकत्र येणारच नाही
असंही नाही.


प्रत्येकाला स्वत:चं मत मांडण्याचा
अधिकार आहे
या मताचा मी आहे.
म्हणून,
माझ मत तुमच्या संसदेविरूध्द !

Thursday, September 19, 2013

बायको पुन्हा मला...

 

बायको पुन्हा मला नवी वाटू लागली
माया आईची माझ्या मनी दाटू लागली

हात केसातून फिरता जखम वाहू लागली
गाय वेडी पाडसाला वनी चाटू लागली

बघता तिला सृष्टी सारी गोड भासू लागली
काळजाची जीवघेणी धून फाटू लागली

शांतता एकटेपणाची मला भेटू लागली
बायकोच्या भव्य कुशीत रात रेटू लागली

फडफडलो वादळातुनी आग पेटू लागली
झुळूक वेडी वार्याची अंग लपेटू लागली

पांगनार्या सावल्यांना वेळ काटू लागली
घेतानाच निरोप का दया आटू लागली ?

फेडली बाई रस्त्यात गर्दी पांगू लागली
वस्तीत झुंड हिजड्यांच्या टाळ्या पिटू लागली

Sunday, September 15, 2013

देव माझा

देव माझा

 


आज पावेतो त्याला                         नाही कुणी पाहिला
शेंदुरच फसला                                  दगडाला

वाहिली मूर्तीपुढे                                 झाडावरची जिती फुले
जशी सुकली मुले                              भाकारीविना

तुटता झोपडी                                    तो मुकाही हरला
तरु उराशी धरल                                 देव्हारा

डोळे झाकून पाहती                           समोरची सृष्टी
अधू झाली दृष्टी उजेडातही

घाली बोटात अंगठ्या                       नसे मनगटी जोर
लागे भजनी थोर                               पाप शमविण्या

भिने खोल डोळ्यात                           देवाचीच नशा
होते दुर्दशा                                         जिंदगीची

ईश्वर नाही जागी                               ती आपली भूक
नेमके ठावूक                                      पुजार्याला

जन्माची पुढच्या                                 दावूनी भीती
लुबाडती किती                                     याच जन्मी ?

मशिदी. गुरुद्वारा                                   चर्च नी देवळे
अब्रूचे सोहळे                                       दिवसाढवळ्या

देवांचा देव                                            माणसांनी घडविला
विकास अडविला                                 पुजार्यांनी

असा कसा देव                                      झाला हो सक्त ?
गाडले भक्त                                           देवळात

श्रीमंतीला नाही जात                             चहूकडे हेच दृश
सारे गरीब अस्पृश                                 पैश्यापुढे

भिकार्याहून भिकारी                               मागतो दान
असे कसे ध्यान ?                                  देवाचे माझ्या

या तेहतीस कोटीमधी                             कुणाला भजावे ?
पोटाला पूजावे                                         माणसांनी

तो आहे त्याचा                                       जो धनाला पुजतो
त्यालाच तो पावतो                                  देव माझा

Saturday, September 14, 2013

बाबासाहेबांचा अभंग



पुस्तकांचा लोभी                    खपवी डोके
अज्ञानाची भोके                     बुजविली

लढला अहोरात्र                     न झोपता
अंधार कोपता                      प्रकाशाला
 
ओलांडूनी शतके                   अचूक जोखणारा
भविष्यात पाहणारा               विश्वदूत

झाला महामानव                   तुमच्या आमच्यातला
देव देवळातला                     ओशाळला

डोळ्यात घेवूनी आग              गात मुक्तीची गाणी
पाजीयले पाणी                    भल्याभल्यांना

"कोड"ग्या बिलाचे                भेदुनि तख्त
महिलांना केले मुक्त              जोखडातुनि

होता पिचलेला                   सारा कामगार
केला हलका भार                 कायद्यान्वये

झापडे लावून आम्ही            अडकविला जातीत
कोंबला पुतळ्यात               पुजण्यासाठी

पडण्या पाठीवरी                  प्रस्थापितांचा हात
स्वकीयांना घालूनी               लाथ उभे दारात

सजवूनी बुद्धाला                  घालती साकडे
कापती कोंबडे                    सणावारी

खुडले ते बोट                     "लढा" म्हणणारे
वेगवेगळे नारे                    प्रत्येकाचेच

मार्ग नुसता सांगणारा           नव्हता मार्गदाता
होता मुक्तिदाता                   बाबासाहेब !

Friday, September 6, 2013

जंगले सारी खुडुनि




जंगले सारी खुडुनि पहा रोवली कुंडीत
पाखरे हिंडती नभी श्‍वास आपुला धुंडीत

लोपली हिरवी झगमग दिव्यांचा अंध प्रकाश
परतले उजेडात देव होते गाठले खिंडीत

असतेच प्रेम असेही शरीराच्या पल्याडले
मीळते उब मायेची गच्च मीठीतील थंडीत

घेऊन हाती आरसे परंतु झाकती चेहरे
राहुनि नामानिराळे ते माणसांच्या झुंडीत

पायाला बांधून चक्रे पळतात सैरावैरा
पाठलाग मरणाचा पण धुंद आपुल्या दिंडीत

कढीच्या शिळेपणाला दिली खमंग फोडणी
ऊत-मात झाला सुरू दहिकाल्याच्या हंडीत

देऊनी ठाम नकार सार्या नावडत्या गोष्टींना
झाले पुन्हा सुरू युध्द  जुनाच  हिशेब  मांडीत

Friday, August 30, 2013

मला भूतकाळ जगायचा नाही...



आपली पहिली भेट झाली
तो क्षण सुदैवी की दुर्दैवी याचा मी कधीच केला नाही विचार
आपली भेट झाली हेच महत्वाचे .

आपण दुरावलो _
मी दुखावलो.

तू दुखावालीस की नाही
याचाही मी विचार करीत नाही.
फक्त
आपण दुभंगलो
त्या वळणावर स्वताला सोडून
मी एकटाच माघारी परतलो .
मनसोक्त आंघोळ करून
मी घेईल आता दीर्घ झोप
नि, झोपेतच
आपण मिळून उपभोगलेल्या सुखांच्या
थडग्यावर मेणबत्ती पेटवून
पुन्हा गाढ झोपी जाईल .
आत्ता :
माझ स्वप्न माझ असेल
माझा क्षण माझ्या एकट्याचा असेल
माझी सावली माझी असेल.

तुला पुन्हा भेटवस वाटत नाही मला
मला भूतकाळ जगायचा नाही...

भुकेचे गणित कसे सुटेल ?


आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही पोटापाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. भूक ही प्राणीमात्राची मुलभूत गरज आहे. मनुष्य त्याला अपवाद नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला दिवस-रात्र एक करावी लागत आहे. परंतु देशातील काही मंडळी मात्र जेवण्यासाठी जगतात की जगण्यासाठी जेवतात हेच कळत नाही. त्यांची भ्रान्त मिटलेली असते. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या अशा कुबेरांच्या जोडीला मात्र करोडो लोक असे आहेत ज्यांना पोटाला दोन वेळचेही अन्न मिळत नाही.
महासत्ताक राष्ट्र बनण्याच्या शर्यतीत उतरलेल्या आपल्या देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी रूपयाप्रमाणे न घसरता महागाईप्रमाणे वाढतच चालली आहे. ही वाढती दरी कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता मलमपट्टी करून दुखणे बरे करण्याचेच धोरण आजपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानवी विकास आणि कृषी क्षेत्राला गती देणारे  अन्नसुरक्षा विधेयक संमत करून बेरजेचे राजकारण केले आहे. मतांची बेगमी करण्यासाठी राजकारणाचा वापर करणे हे नेहमीच धोकादायक असते. असे राजकारण करण्यात सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षही आघाडीवर आहे, हे भारतीय लोकशाहीला मारक आहे.
ढोर मेहनत करूनही गरीब माणूस पैशाअभावी पोटाला चार घास अन्न विकत घेऊ शकत नाही. तो उपाशी- तापाशी मर मर राबतच असतो. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करणा-या देशासाठी आणि आर्थिक महासत्तेचा दावा करणा-या आपल्यासारख्या राष्ट्राला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. गरिबी व भूक संपविल्याशिवाय देशाच्या विकासाचा वेग वाढणार नाही.
अन्नसुरक्षा विधेयकामुळे आता केवळ एक ते तीन रुपयांत मासिक पाच किलो धान्य मिळणार असल्याने त्या व्यक्तीची अन्नाची चिंता कमी होईल. त्याची उत्पादनक्षमता वाढेल, अन्नधान्याचे उत्पादन अधिक होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाचा वेग अधिक होईल,अशी भाबडी आशा बाळगण्यातही काही अर्थ नाही. पोटाची खळगी भरणे म्हणजेच समृध्द जीवन जगणे नसते. पशू पक्षी, जनावरेही आपले पोट भरून जगतच असतात. केवळ पोट भरणे हेच त्यांचे एकमेव उध्दिष्ट असते. तसे मानवाचे नाही. आधुनिक काळात त्याचे राहणीमान उंचावले आहे.भूकेशिवाय त्याच्या अनेक मुलभूत गरजा आहेत. ज्या कधीच भागविल्या जात नाहीत.
देशाच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे 3 टक्के रक्कम या योजनेसाठी खर्च होणार आहे. पण ही टक्केवारी 1.6 टक्क्यांच्या वरही जात नाही. कारण अन्नसुरक्षा विधेयकात समाविष्ट करण्यात आलेली कुटुंबे ही अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी नाहीत. सध्या अंत्योदय योजनेचा लाभ देशातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांना होत आहे. या कुटुंबांना दर महिना एक रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे. भविष्यात अन्नधान्याचे उत्पादन  सध्याच्या उत्पादनापेक्षा अधिक झाल्यास खर्च खाली येऊ शकतो, याचाही विचार व्हायला हवा.
गरिबांना कमी भावाने धान्य दिले पाहिजे पण ते देताना त्यांना  पोटभर खाता यावे हाच हेतू असला पाहिजे. देशातल्या गरीब लोकांना स्वस्त धान्य पुरवण्याची तरतूद या विधेयकात आहेच, पण दारिद्य रेषेच्या वर राहणार्या  काही लोकांनाही बाजारभावापेक्षा कमी भावाने धान्य देण्याची तजवीज आहे. दोन्ही गट धरून देशातल्या 64 टक्के  लोकांना कमी दरात धान्य देण्याची सरकारची योजना आहे. त्यातल्या दारिद्य रेषेखालील लोकांना तीन रुपये दराने तांदूळ, दोन रुपये दराने गहू आणि एक रुपये प्रति किलो दराने बाजरी देण्याचा विचार आहे. कुटुंबातल्या एका व्यक्तीला दरमहा सात किलो असे पाच जणांच्या कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाणार आहे.
देशातल्या काही राज्यांत अशाप्रकारची  योजना सुरू आहे. ती दारिद्य रेषेखालच्या लोकांसाठीच आहे. केंद्र सरकारने दारिद्रय रेषेवरचाही एक वर्ग या योजनेत समाविष्ट केला आहे. केवळ दारिद्रय रेषेखालचा वर्ग यात घेतला तर तो लोकसंख्येच्या 40  टक्के भरतो, पण त्यात नवा वर्ग समाविष्ट केला तर तो लोकसंख्येच्या 64 टक्के होतो. आधी या विधेयकात ग्रामीण भागातल्या 46 टक्के लोकांचा समावेश होता. तो आता 75 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी शहरातल्या 28 टक्के लोकांचा समावेश होता तो आता 50 टक्के करण्यात आला आहे. या दोन्ही आकडय़ांची सरासरी काढली तर ती एकूण लोकसंख्येच्या 64 टक्के होते. यातल्या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या रेषेच्यावरच्या लोकांना फार सवलतीने धान्य मिळणार नाही,  पण सरकार हे धान्य ज्या हमी भावाने खरेदी करते त्याच्या निम्म्या दराने मिळेल. अशा रितीने 64 टक्के लोकांनाच काय पण 100 टक्के लोकांना जरी स्वस्त धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला तरी काही हरकत नाही. पण त्याचा बोजा सरकारची तिजोरी कशी उचलणार हा प्रश्न आहे.
या योजनेसाठी  सरकारला दरसाल 95 हजार कोटी रुपये मोजावे लागतील. सरकार गव्हाची खरेदी 11 रुपये प्रती किलो या भावाने करत आहे आणि तांदळाची खरेदी 11 ते 18 रुपये प्रती किलो या भावात करत आहे. असे हे धान्य खरेदी करून ते केवळ दोन किंवा तीन रुपयांना लोकांना पुरवणे हे कल्याणकारी असले तरी  त्याचा परिणाम देशाच्या तिजोरीवर कसा होईल याचाही विचार केला पाहिजे. देशाचा चेहरामोहरा बदलणारे,  सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारे, कल्याणकारी राज्याची संकल्पना वास्तवात आणणारे हे विधेयक असले तरी ज्या लोकांपर्यंत ही अन्न सुरक्षा पोहोचवायची आहे,
ज्या लोकांच्या फायद्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे .त्याचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहचेल का हाही एक प्रश्न आहे. ज्यांच्या मुखात अन्न पडावे  या हेतूने ही योजना केली आहे त्यांना ते अन्न मिळेल का ?  वितरण व्यवस्था सुधारल्याखेरीज या कायद्याची अंमलबजावणी नेमकेपणाने होणार नाही. त्यासाठी सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली माध्यमातून ही योजना पारदर्शीपणे आणि भ्रष्टाचारमुक्त कशी राबवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार कशाप्रकारे भुकेचे गणित सोडवते हे येत्या काही वर्षातच समोर येईल.

Wednesday, August 28, 2013

रडलो मी जरासा


पाहुनी वाट तिची रडलो मी जरासा
थांबू नकोस तुही पावसा पड जरासा

घामाचा गंध तिच्या पसरे रानोमाळी
पाहुनी कष्ट तिचे उडलो मी जरासा

हरवले हासणे अन विसरली लाजणे
झुंडीत लांडग्यांच्या नडलो मी जरासा

आरसा पुसला तरी भाग्य उजळेना
पाहताना स्वताला अडलो मी जरासा

हुलकावण्या देत मरणाला जगतो असा
उठलो, पडलो तरीही झडलो मी जरासा

करती बोभाटा ते माझ्या वागण्याचा
प्रेमात दुष्मनाच्या पडलो मी जरासा

सोसले तिने जितके सोसायचे होते
दुख्खाशी तिच्या जडलो मी जरासा

Monday, August 26, 2013

खुळखुळा



वेश त्यांचा वेगळा अन देशही वेगळा
देव त्यांचा वेगळा श्वास आमुचा वेगळा

देवळे उभारली त्यांचा पाडुनी उभ्या शाळा
उरला आमुच्या हाती आभाळाचा फळा

नको बळ आता उरल्या दुख्खाच्या कळा
जो तो इथे दाबतो हुंदका हा कोवळा

बसे जाऊनी संसदी गल्लीतला बावळा
वेगळा दिसे सिंहासनी कालचा कावळा

आमुच्या ढेकरांनी करपे त्यांचा ळा
नुसत्या पादन्याचाही ते करती सोहळा

फासुनी भाळी नीळा लावला आम्ही  टिळा
कमरेस आता कधीचा खोचला मी विळा

लढन्यातच जरी गेला सारा जन्म खुळा
जगही बदलू शकतो वाजणारा खुळखुळा

असे वाटते की...


 





असे वाटते की मला तू जपावे
मला सोसताना तुला तू जपावे

तुझ्या शुष्क ओठी माझे गीत यावे
मीटुनी तू डोळे मलाही पहावे

खुळ्या आठवांचा सडा कोसळावा
विसरुनी मला तू स्वतःला स्मरावे

मी गावे गोडवे तुझ्या छळाचे
पाहुनी स्वत:ला आरसी लपावे

पुन्हा रात्र यावी चोरपावलांनी
तुला मी भुलावे मला तू गुणावे

फुटावी मीठीतून वाट चांदण्याची
अशा काळोखाला उराशी धरावे

तुझ्या सावलीची तुला वाटे भीती
तुझे वागणे का तुलाही खुपावे?

Thursday, August 22, 2013

marathi mandali

<a href=”http://www.marathimandali.com/” target=”_blank”><img alt=”Marathi Mandali!” src=”http://goo.gl/F2YA”></a>

Tuesday, August 20, 2013

निळ्या वातीच्या उजेडी


उभ्या भरगच्च पिकात कसा येईना ढेकर?
घाम गाळून गाळून मला दिसेना भाकर !
नाही शिकले मी शाळा दुख्ख पाचवीला पूजले
ढकलत सार आयुष्य सुख गर्भात कुजले !

भूक चिकटे पोटाला नाही दाणही चाखाया
आहे फाटक लुगड लाज नागडी राखाया !

देव देवळात बसे आहे का त्याला लाज ?
आम्हा नागड करून तो मढविती साज !

निळ्या वातीच्या उजेडी स्वप्न वटीत बांधते
आटलेल्या थानाला भूख लेकरू लोचते !

धन्यासंग रडताना रात सरता सरेना
उबदार मिठीत पाखरू धरता धरेना !

नाही लावली आम्ही दोन्ही हाताना ती धार
माझी लेकर करतील उद्या गरीबीवर वार !!

एकता

विसरूनि सारे भान हरपुनी सच्चा कलेचा भोक्ता
पुढे चालला एकोप्याने कलाप्रेमींचा जथ्था ..... !! धृ् !!

एकता ... एकता ... एकता ... (कोरस)

मराठी आमुची मायबोली
नाटक अन सिनेमाची जोडी
जपुनी वारसा नृत्याचा
आम्हा लागली कवितेची गोडी
अपयश जाई माघारी आता आम्हा न रोखता !!1!!

एकता ... एकता ... एकता ... (कोरस)

जाती-धर्रमाच्या भेदुनी भिंती
प्रान्त, रूढींच्या सोडुनि गाठी
जमुनि सारे मंचाभोवती
विशुध्द कलेच्या वृध्दीसाठी
स्वप्ने बांधुनी डोळंयांना आम्ही चाललो न वाकता !!1!!
एकता ... एकता ... एकता ... (कोरस)

आम्ही धुरंदर, आम्ही कलंदर
आम्ही उद्याचे तारे
आमुच्यासाठी खुली कवाडे
उभे ठाकले आभाळ सारे
दाही दिशातून आवाज घुमला आरोळी ठोकता !!३!!

विसरूनि सारे भान हरपुनी सच्चा कलेचा भोक्ता
पुढे चालला एकोप्याने कलाप्रेमींचा जथ्था .....

तुझ्या मनातलं, माझ्या मनातलं

थोडंसं आभाळ, थोडासा चंद्र
थोडासा दर्या नि मातीचा गंध
थोडंसं हसू, थोडेसे आंसू
थोडीसी दुरी पण गारठा धुंद
काही कळेना कसे रेखाटू
चित्र तुझ्या मनातलं, माझ्या मनातलं !! धृ !!

विहिरीवानी मन तुझ
खोल, गूढ, विशाल
ठाव लागता लागेना
जेव्हा वाटत उमगल
पाहुनी तुझ गोड हसू
मी विसरे क्षणातलं !!१!!

हारातील दुख्ख तुझ्या
सांगू नको ग होर्यातल
रानातल फुल कुणी
ओवल दोर्यात ?
सांग, कळेल कधी मला
गूढ मनाच्या खणातलं !!२!!

रात्र - दिन खपली तू
घरी ठेवून सावली
डोई उन्हे पांघरून
दाही दिशा तू धावली
मलाही चाखू दे आत्ता
सुख तुझ्या र्रुनातल !!३!!

Thursday, August 8, 2013

madhuri dixit, naseeruddin shah, pariniti chopra and sunny leone





class


shahrukh khan



hrutik roshan


rakesh roshan


katreena kaif


prachi desai


sharmila tagor


kangana ranwat


babasaheb ambedkar




karishma kapoor


Wednesday, August 7, 2013

मला भूतकाळ जगायचा नाही


 





आपली पहिली भेट झाली
तो क्षण सुदैवी की दुर्दैवी याचा मी कधीच केला नाही विचार
आपली भेट झाली हेच महत्वाचे .

आपण दुरावलो _
मी दुखावलो.

तू दुखावालीस की नाही
याचाही मी विचार करीत नाही.
फक्त
आपण दुभंगलो
त्या वळणावर स्वताला सोडून
मी एकटाच माघारी परतलो .
मनसोक्त आंघोळ करून
मी घेईल आता दीर्घ झोप
नि, झोपेतच
आपण मिळून उपभोगलेल्या सुखांच्या
थडग्यावर मेणबत्ती पेटवून
पुन्हा गाढ झोपी जाईल .
आत्ता :
माझ स्वप्न माझ असेल
माझा क्षण माझ्या एकट्याचा असेल
माझी सावली माझी असेल.


तुला पुन्हा भेटवस वाटत नाही मला
मला भूतकाळ जगायचा नाही...

चेहरा तुझा दिसो



 







उघडताच मी डोळे, चेहरा तुझा दिसो
जरी मिटले असले तरीही , स्वप्नही तुझे दिसो !!धृ !!

ज्या वाटेवर तुझ्या होत्या पाऊलखुणा
त्या वाटेवर पुन्हा जाऊ दिले ना कुणा
तू आरसा झाली असता, चेहरा माझा नसो !!१!!

चिंब भिजुनी पावसात, उरी जखम सांभाळताना
पाणी पावसाचे आणि , अश्रू नेमके ओळखताना
जन्मोजन्मी कधीही, मी ना असा फसो !!२!!

मी वाट पहिली तुझी, ना लवली पापणी माझी
जी जखम दिली तू ताजी, मी भोगली राजी राजी
तुला नेताना तो यमही, आकाशी गाली हसो !!३!!

मरणाची नाही भीती, ते तर तुझ्याच हाती
जगणे घेउनि येती वांझोटी स्वप्न रिती
पण कफानाच्या जागी ती , ओढणी तुझी असो !!४!!

हिरव्या हिरव्या रानात....


हिरव्या हिरव्या रानात माझ्या मोर नाचतो बावरा
थुई थुई नाचे मनात माझ्या कृष्ण मुरारी सावळा !!धृ !!

अंगी माझ्या खुलू लागले
दिवस उन्हाचे कोवळे
तरुण्यामधी पाय टाकिता
झुगारले मी सोहळे
निळे जांभळे रंग खुलविती प्रीतीचा हा सोनमळा !!१!!

मीच बसले हरवून मजला
वार्यावरती मन झुले
कवेत घेता तुला स्मरूनी
आभाळाचे दार खुले
डोळे मिटुनी मला पाहू दे दोन जीवांचा सोहळा !!२!!

बावरले मी तुझीच राधा
मलाच माझे कोडे पडे
मीच झाले अवघे गोकुळ
आकाशातुनी पुष्प सडे
मला भावला जगावेगळा स्वभाव तुझा वेंधळा !!३!!

चकाकते सरण


 





निळ्या आभाळात कुणी बांधले तोरण?
काजव्यांच्या उजेडात चकाकते सरण !! धृ !!

पक्षी गेले झोपी अन हलेनाही पान
सटविच्या आवाजाने शहारल रान
मुक्या नदीला रेटून गहिवरते धरण !!१!!

दुख्ख बसत खेटुनी ओठांवरी येई गाणं
आसवात भिजलेया देखणे सपान
ठेच लागता कपाळी भाळभाळते चरण !!२!!

आग भिडे गगनात हुंदका छातीत
सोन्यावाणी देह आता मिसळे मातीत
जगण्याच्या हट्टापायी थरथरते मरण !!३!!

विसरलोच आम्ही


 





कपडे कितीही घातले तरी, सावली नागडी असते
मायेची उब देणारी तेव्हा, आईची गोधडी असते

लाथाडले कितीही परंतु, दु:ख पायातच घुटमळते
जन्मोजन्मीचे मैत्र जसे, सोन्याची लगडी असते

मुंग्यांना साखर घालणारे, कोरडे अश्रू ढाळतात
काळीज तयांचे मात्र , नेहमीच दगडी असते

संकटाच्या समयी पहा, माणसेच धावून येती
मदतीला देव येतो, ही श्रद्धा बेगडी असते

धन्य जाहले जाती-जातीत रेषा ओढणारे
डोक्यावर मुकुट नव्हे, त्यांच्या पगडी असते

संसदेचा बाजार मानडणारे, खुलेआम भांडती जेव्हा
जनतेला लुटण्यासाठी, घातलेली फुगडी असते

देवाधर्माच्या लागुनी नादी, हाय! विसरलोच आम्ही
एकजूट भुकेकंगालांची, बंदुकीहून तगडी असते

तुझी आठवण येते


 





ती : सळसळत्या वार्यात , खळखळत्या पान्यात
तो : टळटळत्या उन्हात, भळभळतय जखमेत
ती: तुझी आठवण येते मला या भयाण रातीत....
ती : गेला कष्टात दिवस निघून
मी पडले थकून भागून

रात झोपली उशाशी माझ्या
तुझ्या आठवणी झाल्या ताज्या
तुही जागा असशील तिथं त्या परक्या शहरात !!1!!
तुझी आठवण येते मला या भयाण रातीत....

तो: केलंं भुकेनं परागंदा
फीरतो धुंडीत नोकरी धंदा
इथं गर्दीला नाही चेहरा
सावलीवरही लागे पहारा
मी फिरतो अनवाणी भीती घेऊन ऊरात !!2!!
तुझी आठवण येते मला या झगमगत्या शहरात.....

ती : गेलं सुकून सारं रान
पाखरं हिंडती शोधत दाणं
पोरं बिलगती खायाला आनं
नाही खर्चाया फुटकं नाणं
कशी एकटी मी राहू अशा जालीम दुनियेत? !!3!!
तुझी आठवण येते मला या कुडाच्या घरात....

तो: तुझ्या मिठीत विसराया सारं
ठेव जपून माझ्या खुणा
गाणं मुक्तीचं गायाला
मी परतुनी येईन पुन्हा
मग ’फुलांनी सजवून काढू भावी सपनांची वरात !!4!!
तुझी आठवण येते मला तुला पाहिल्यावर माझ्यात

कळले तुला न तेव्हा


 








कळले तुला न तेव्हा, माझा आधार होता
हा जीव तुझ्यासाठी, माझा उधार होता

माझ्या मीठीत मी तुला, दिलेला आकार होता
दैवावर रूसन्याचा तुझा, रूसवा टुकार होता

शरीराच पलिकडल्या , प्रेमाचा सार होता
माझ्या अंतरीचा तो, छुपा होकार होता

छळणारा हुंदकाही, जीवाला घोर होता
अश्रुंनी काळजावर, कोरलेला प्रहार होता

आभाळ रंगविन्या , का तुझा खार होता ?
जगण्याच्या नियमाना माझा नकार होता

फुलांसह ’फुलन्यावर, तेथे अधिभार होता
जो केला वार तो मी , वारही सुमार होता

जपलेल्या जखमाना, सुखाचा भार होता
नितीशी झोंबताना, माझा डकार होता

वाट पाहते तुझी साजना

या शुष्क डोळंयावर बांधिले अश्रूंचे तोरण
वाट पाहते तुझी साजना किणकिणले कंगन !!ध्रृ !!

आकाशी मी हात उभारून
उंच धरले फुल जपून
ओठांवरली तुझी ती खूण
छळते आता आरसा पाहून
पाहू नको तू अंत आता फुटेल हे धरण !!1!!

उन्हे कोवळी गाणी प्याली
नि:शब्द फुलांची वाणी झाली
मावळतीच्या छटा गुलाबी
येतील पुन्हा माझ्या गाली
कोरूनि ठेवीन काळजावरी नात्यानचे गोंदण !!2!!

खेटुनी जाते मरणही मजला
तुझ्याचसाठी श्‍वास मी भजला
जवळी तू असता जीवही सजला
निबंधाचही होती गजला
साचलेल्या आठवणींचे करू दे पारायण !!3!!

देहाचे मी करूनि अंगण
धुंडिते सारे ते तारांगण
कोमजलेले फुल पाहुनी
जन्मा आले माझेही मरण
ठेवीन सारी दु:खे नि मजला तुझ्याकडे तारण !!4!!

Thursday, August 1, 2013

आम्ही स्वाभिमानी


 





निधड्या छातीवरती कोरु नव्या युगाची वाणी
हातामध्ये हात गुंफुनी गाऊ मुक्तीची गाणी

आम्ही स्वाभिमानी.....आम्ही स्वाभिमानी !!धृ !!

युगायुगाची, अन्यायाची
इतिहासाची वाहुनी ओझी
वेशीबाहेर तिष्टत राहुनी
नागपुत्रांनी साहले पाजी जातीवाद्याना वेसन घालूनी
काळोखाला मागे रेटून
पुढे चालली, निळ्या चित्यांची सेना ही मानी !!१!!

या धरतीवर, आभाळावर
या सत्तेवर, या मत्तेवर
या जगण्यावर, या काळावर
नाव कोरूया चला भाळावरबुद्ध , कबीर अन भीमबाबांच्या
फुले, शाहू ,अन शिवरायांच्या
लखलखनार्या त्या विचारांच्या आता लुटू खाणी !!२!!

नव्या दमाचे, नवे सोबती
नव्या स्वप्नांची, नवी संगती
कडाडणाऱ्या डफलीवरती
थाप पडू दे आसमंती
एक दिलाने , निर्धाराने
युद्ध जिंकण्या समानतेचे
आवाज घुमू द्या चोहबाजुनी बुरुजांच्या कानी !!३!!

- कवी भगवान निळे

शोधू कुठे मी आता


 





शोधू कुठे मी आता, माझा सखा तो भीम
दिसतो मला न आता, लढणारा माझा भीम

धरतीने धरले पाय, आभाळाने ओढले हात
वाराही झाला फितूर, त्यानेही केला घात

पुसण्या न आली डोळे, चुकार नदी माय
नभी फोडती हंबरडा, चुकलेली रानी गाय

रोज अब्रू झाकताना, बहिणींची विरली वस्त्रे
स्वप्नातही भेडसावी, नजरेची विखार शस्त्रे

विझुनी गेल्या मशाली, हाती आल्या पखाली
झिंगलेला समाज मागे, दैवाकडे खुशाली

थंडावले सारे बंड, नेतेही निघाले षंढ
जिन्दगानीत आमुच्या, का उजेडाचा खंड ?

मातीतुनी निघाला, निढळया घामाचा गंध
पाजळा नवी हत्यार, युद्धाचा जपुनी छंद

बुद्धाच्या नावान



जयभीम म्हणण्या लाज वाटते काय करू मी राव ?
पण बुद्धाच्या नवान खंडोबा तू तरी पाव !!धृ !!

हुंडा घेवूनी लगीन केल
हळद, बाशिंग माथी बांधल
नवस केला नि मुलगा झाला
बाबांच्या नवान नारळ वाहिला
पोटासाठी शहरी आलो सोडूनी माग गाव !!१!!

राखीव जागा म्हणुनी तरलो
सचिवालया मधी चिकटलो
मोर्चामधली गर्दी वाढली
जयंतीची मग पावती फाडली
बदलूनी टाकीन म्हणतो आता माझ मी आडनाव !!२!!

चार भिंतीत कोंडूनी घेतो
अन्यायाच्या कथा वाचतो
विसरुनी सारी नातीगोती
स्वार्थासाठी खाल्ली माती
धेड हिंनाविता अजुनी बसतो जहरी माझ्या घाव !!३!!

चेहरा तुझा दिसो


उघडताच मी डोळे, चेहरा तुझा दिसो
जरी मिटले असले तरीही , स्वप्नही तुझे दिसो !!धृ !!

ज्या वाटेवर तुझ्या होत्या पाऊलखुणा
त्या वाटेवर पुन्हा जाऊ दिले ना कुणा
तू आरसा झाली असता, चेहरा माझा नसो !!१!!

चिंब भिजुनी पावसात, उरी जखम सांभाळताना
पाणी पावसाचे आणि , अश्रू नेमके ओळखताना
जन्मोजन्मी कधीही, मी ना असा फसो !!२!!

मी वाट पहिली तुझी, ना लवली पापणी माझी
जी जखम दिली तू ताजी, मी भोगली राजी राजी
तुला नेताना तो यमही, आकाशी गाली हसो !!३!!

मरणाची नाही भीती, ते तर तुझ्याच हाती
जगणे घेउनि येती वांझोटी स्वप्न रिती
पण कफानाच्या जागी ती , ओढणी तुझी असो !!४!!

बार बार देखो…


 

 









तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2005 साली राज्यातील डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. डान्सबारच्या नावाखाली बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी राज्याच्या गृहविभागाला मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता, असे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे बारबालांचा व्यवसाय अडचणीत येईल, असे कारण पुढे करून डान्सबार असोसिएशनने कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून राज्य सरकारविरुद्ध डान्सबार असोसिएशन असा लढा न्यायालयात लढला जात होता. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविण्याचा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारची नक्कीच नाचक्की झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने बंदी घातल्याने समाजाची नीतिमत्ता किती जपली गेली, हेही शोधून पहावे लागेल.सात वर्षापासून मुंबई आणि नवी मुंबईतील डान्सबार बंद होते म्हणून मुंबईत महिलांचे शोषण कमी झाले याचा दाखला नाही. महिलांच्या लैंगिक शोषणात, बलात्कारात, गुन्हेगारीत घट झाली, असेही कुणी छातीठोकपणे सिध्द करू शकत नाही. पूर्वी बारमध्ये जाणारे `दुःशासन’ बार बंद झाल्याने `सत्पुरूष’ झाले, असेही म्हणता येणार नाही.
नव्वळ नैतिकतेच्या आधारे घातलेल्या बंदीला आजवर जगभारत कुठेही थारा मिळालेला नाही. सामाजिक वास्तवाचा अभ्यास न करता कारवाईचा बडगा उगारत आपल्या पतिव्रतेचा डिंडोरा पिटला तरी वास्तव बदलत नसते. हेच खरे.
राज्यघटनेतील कलम 14 अन्वये प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये किंवा टीव्ही शोमध्ये शास्त्रीय नृत्य नव्हे तर `डान्स’ चालतो. तर बारमध्ये बारबालांवर डान्स करू देण्यावर बंदी का? डान्सबारमुळे अनेक महिलांना रोजगार मिळतो. त्यांच्या रोजगारावर घाला घालण्याचा कुणालाही अधिकार नाही.
डान्सबार बंद झाल्याने केवळ मुंबईतील 30 हजार बारबालांना शरीरविक्रय करून आपली रोजीरोटी मिळवावी लागत आहे. यातल्या सुमारे 15 हजार मुली रस्त्यावर फिरून त्यांच्यासाठी गिर्हाईके शोधत आहेत. मुंबई, नवी मुंबईत बारबालांची संख्या एकूण 75 हजाराच्यावर आहे. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून असते.यातील बहुतांश मुली आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या आहेत. डान्सबारमध्ये नृत्य करणार्या मुलींमध्ये महाराष्ट्रातील मुलींची संख्या नगण्य आहे. डान्सबारमध्ये काम करणार्या मुली या बहुतांश अल्पसंख्याक आणि दलित समाजातून आलेल्या असतात. खेडय़ापाडय़ात उच्चवर्णिय आणि धनदांडग्याकडून त्यांचे शारीरिक आणि सामाजिक शाषण झालेले असते.नैतिकतेचा टेंभा मिरविणारेच त्यांच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहतात. हे वास्तव आहे.
बडय़ा शहरांमध्ये अतिश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय मंडळी पबमध्ये जाऊन काय करतात? प्रवेश शुल्काच्या बदल्यात त्यांना पबमध्ये कसेही नाचायला, धिंगाणा घालायला परवानगी मिळतेच ना. तेव्हा कुठे जाते नैतिकता? शहरातील मोठमोठय़ा पंचतारांकित हॉटेलवर धाडी पडतात तेव्हा गिर्हाईकांसोबत बारबाला सापडत नाहीत. तर महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या, चित्रपट, टी.व्ही. मालिकांमधून काम करणार्या, मॉडेल्स सापडतात. मग अशा पबवर बंदी का घालण्यात येत नाही? श्रीमंतांसाठी एक न्याय आणि गरिबांसाठी दुसरा. हा भेदभाव कशासाठी?
डान्सबारमध्ये महिलांचे खरोखरच लैंगिक शोषण होते का हा संशोधनाची विषय आहे. बारबालांचे खरोखरच शोषण होत असते तर एकातरी बारबालेने त्याविरूध्द नक्कीच आवाज उठविला असता. त्यांच्या इच्छेखातर त्यांनी हा व्यवसाय अवलंबिलेला असतो. त्यांना जबरदस्तीने कुणी या धंद्यात ओढत असेल तर अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याचे धाडस सरकारने दाखवावे.त्यासाठी कडक कायदे करावेत. मागासलेल्या राज्यांमध्ये जगणेच मुष्कील झाल्यामुळे नाईलाजास्तव या मुली बारमध्ये येतात.प्रथमतः त्याच्या पोटापाण्याची, शिक्षणाची मुलभूत गरज भागविली पाहिजे. जुन्या चाली- रिती मोडून काढल्या पाहिजेत. उ. प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदि अनेक राज्यातील काही भागात असा समाज आहे,ज्यांचा नृत्य करून पोट भरण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांची घराणी आहेत. धर्माच्या नावाखाली त्यांचे पिढय़ान्पिढय़ा होत असलेले शोषण प्रथमतः थांबविले पाहिजे.
मुंबई शहरात देशाच्या कानाकोपर्यातून पोट भरण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर माणसांचा तांडा दररोज थडकत असतो.मुंबई त्यांच्या पोटाचा आणि निवार्याचा प्रश्न सोडवते. परंतु निसर्गनियमानुसार प्राणीमात्राला शारीरिक भूकही असते.त्याला मनुष्यप्राणीही अपवाद नाही. प्राण्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सामाजिक बंधने लाधलेली नसतात. त्यामुळे मानवाप्रमाणे त्यांची लैंगिक कोंडी होत नाही. लैंगिक कोंडी फाडून काढण्यासाठी , तिचा निचरा करण्यासाठी मानव वेगवेगळे मार्ग शोधत असतो, कुणी अश्लील पुस्तके वाचून, कुणी अश्लील सिनेमे पाहून, कुणी दूरध्वनीवर अश्लील संभाषण करून, हस्तमैथुन करून, कुणी वेश्यागमन करून, कुणी प्रेमसंबंध प्रस्थापित करून, कुणी विवाह करून आपापल्या गरजा भागवित असतात. हे सगळेच मार्ग सगळ्यांना उपलब्ध आणि सोईचे असतात असे नाही.
डान्सबारमध्ये बारबालांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने, त्यांना ओझरता स्पर्श करता येत असल्याने वेश्यागमन करणे अनैतिक मानणारे, कुणी मुलगी पटवू न शकणारे, बहुतांश तरूण आपल्या लैंगिक समस्येचा निचरा करण्यासाठी अशा प्रकारच्या बारमध्ये जातात. बायकोशी पटत नसणारे अनेक वयोवृध्द नवरे बारमध्ये हजेरी लावतात.त्यांना तेथे क्षणिक का होईना सुख मिळतेच. त्यांच्या लैंगिक कोंडीला वाव मिळाल्यामुळे ते बलात्कारासारख्या अघोर कृतीपासून परावृत होतात हे मान्य करायलाच हवे. केवळ नैतिकतेचे फुसके धडे देऊन भागत नाही, त्यासाठी समाधानकारक उत्तर दिले पाहिजे.डान्सबारमध्ये खुलेआम किंवा लपूनछपून वेश्याव्यवसाय चालतो असे चित्र निर्माण केले जाते. ते तितकेसे योग्य नाही. वेश्याव्यवसाय मुंबईत आजही धडाक्यात सुरू आहे. त्यासाठी आपली शारीरिक गरज भागविण्यासाठी डान्सबारचीच काय गरज आहे.?
`डान्स बार’च्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविले जाते, तिथे होणारी बीभत्स नृत्ये समाजाच्या र्हासाला कारणीभूत आहेत, असा युक्तिवाद सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. राज्यात परवाने असलेले 345 डान्स बार आहेत, तर 2500 डान्स बार हे अनधिकृतपणे चालत होते.असा सरकारचाच दावा आहे. मग या अनधिकृतपणे चालणार्या बारवर सरकारने कधीही कारवाई का केली नाही.?
डान्स बारमध्ये सुमारे 75 हजार बारबाला काम करतात. बंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे अनेक बारबालांनी आत्महत्या केली आहे. या महिलांपैकी 72 टक्के महिला विवाहित असून, 68 टक्के महिला या त्यांच्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. राज्य सरकारच्या निर्णयामुळे या सर्वांच्या पोटावर पाय देण्यात आला होता. त्याबाबतही सरकारने ठोस पावले उचलली नाहीत.बारमध्ये मुली उदरनिर्वाहासाठी नाचत होत्या. बारवर बंदी आणल्याने त्यांच्या रोजगाराच्या हक्कावरच गदा आणली होती. बारमध्ये नाचण्याचा पर्याय मुली का स्वीकारतात, यावर विचार करून मार्ग न काढता बारबंदीचा सरधोपट निर्णय घेण्यात आला होता, हे आता स्पष्टच झाले आहे.
डान्सबार हे खाजगीकरणाचेच अपत्य आहे.हे विसरता कामा नये. खाजगीकरणातून आलेली संपन्नता, चंगळवाद आणि चैनीच्या भ्रामक कल्पना यातून या उद्योगाची भरभराट झालेली आहे. वेश्या व्यवसाय, दारूची दुकाने, गल्लाभरू उद्योग, हे सगळे फार गुंतागुंतीचे विषय आहेत. त्याची सरधोपट, उथळ आणि सोपी उत्तरे नेहमीच चकवा देतात. आपल्याला लोककलेचा फार मोठा वारसा आहे.त्याच्यावर कोटय़वधी लोकांचा उदरनिर्वाह चालतो. बारला ज्यांनी परवाने दिले त्यांनी सरकारला त्यातून महसूल मिळतो याचा विचार केला असणार. त्यातून पोलिस यंत्रणेला आणि राज्यकर्त्यांना मिळणार्या रसदीच्या वाटणीतून उद्भवलेल्या वादातून या कायद्याचा जन्म झाला आहे. त्यालाच नैतिकचा मुखवटा चिकटवून त्याचा गाजावाजा केला जात आहे.
अल्पवयीन मुलींना या धंद्यात ओढले जाते असा आरोप करण्यात येत आहे. तसे असेल तर सरकारला अशा मुलींना बारमध्ये नाचण्याला प्रतिबंध करण्यासाठी ज्युवेनाईल जस्टीस ऍक्ट वापरता येऊ शकतो. त्याठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असेल तर अनैतिक मानवी व्यापार कायद्याअंतर्गत कारवाई करता येऊ शकते. आपल्याकडे कायदे अस्तित्वातअसताना एक नवा आणि तोही विसंगत कायदा करण्याची काय गरज होती हा प्रश्न आहे.
खरे पाहता, डान्सबारवर कठोर बंधने घालून त्यांची आचारसंहिता लागू करता आली असती. बंदी घातल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. जगात हजारो वर्षे वेश्याव्यवसाय, मद्य आणि अंमली पदार्थाचा व्यापार आणि कोठय़ा सर्रास चालू आहेत.त्यावर बंदी आणणें हे मानवी इतिहासात आजतागायत कधीही, कोणत्याही शासनसत्तेला शक्य झालेले नाही.याचाही बारकाईने विचार करायला हवा.
डान्सबार बंदीचा निर्णय घेताना 50 हजार बारबालांचे पुनर्वसन करू, असा निर्णय शासनाने घेतला होता. या बारबालांना होमगार्ड, पोलिस खात्यात सामावून घेऊ, अशी आश्वासने दिल्यानंतर सरकारने टेलरिंग आणि केटरिंगसारखी कामे या बारबालांना देऊ करून पुनर्वसन करण्याच्या योजनेची खिल्ली उडवली. हेही नाकारता येत नाही. तसेच, केवळ बारबालांसाठीच नव्हे तर एकूण महिलांच्या भल्यासाठी अश्लीलताविरोधी कायदा संदिग्ध पायावर आधारित नसावा.त्याची योग्य ती कायदेशीर फोड करण्यात यावी. या कायद्याचे मागासलेल्या, वंचित, अशिक्षित, पर्यायहीन मुलींच्या बाजारू लैंगिक शोषणाचा विरोध हेच मूळ स्वरूप असायला हवे.
`डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय म्हणजे राज्यघटनेने दिलेला समान न्यायाचा अधिकार फेटाळणे आहे’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अल्तमस कबीर आणि न्या. एस. एस. निज्जर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा अट्टाहस राज्य सरकारने करू नये. अगोदर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालय दोघांनीही डान्सबार बंदीचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निवाडा दिल्यामुळे पुन्हा आपली नाचक्की करून घेण्यात काय हशिल आहे.? कोणता नवीन मुद्दा अथवा कोणत्या कायद्याचे नव्याने इंटरप्रिटेशन सरकार करणार आहे हे कळायला मार्ग नाही. नाही तर पुन्हा सरकारच्या इभ्रतीचा `बार’ उडेल आणि तो फुसका ठरेल.
भगवान निळे